जळगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढताना दिसत आहे. यातच आणखी एका शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. कर्जबाजारील कंटाळून ५८ वर्षीय शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. सुनील तुकाराम गावंडे (वय ५८, रा. सामरोद ता. जामनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
याबाबत असे की, सामरोद ता. जामनेर येथील सुनील तुकाराम गावंडे शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, त्यांनी घरी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कुटुंबियांना समजताच त्यांनी तत्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले.
रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद होऊन जामनेर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनेप्रकरणी सामरोद गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, सुनील गावंडे यांच्यावर कर्ज असल्याने त्या विवंचनेत ते असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.