रायगड | राज्यात मुसळधार पावसाने दाणदाण उडाली असून रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून या ढिगाऱ्याखाली शेकडो लोक दाबल्या गेल्याची भीती आहे. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी तात्काळ दुर्घटनेच्या ठिकाणी धाव घेतली.
इर्शाळवाडी येथील दुर्घटनेत अनेक कुटुंबे उध्वस्त झाली असून राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी दिले आहे.
ना. अनिल पाटील यांनी म्हटले आहे की, इर्शाळगड येथे दरड कोसळण्याच्या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य या नात्याने स्वतः तत्काळ घटना स्थळी दाखल झालो, माझ्यासह मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब, मंत्री मंडळीतील माझी सहकारी ना.गिरीश महाजन, ना.दादा भुसे, ना. उदय सामंत व आदी सहकारी घटना स्थळी उपस्थित आहेत.
ना. अनिल पाटील यांनी पुढे नमूद केले आहे की, एनडीआरएफच्या २ चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण ४८ कुटुंब येथे आहेत. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत असे ना. अनिल पाटील यांनी नमूद केले आहे.
Discussion about this post