जळगाव । स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचा पारा चांगलाच तापला असून नेते मंडळींकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. खडसे सोईंचे राजकारण करत असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक लढण्यासाठी शेवटच्या क्षणी आमच्याकडे उमेदवार नाहीत आणि निवडणूक लढवण्यासाठी लागणारा पैसा नाही, असे म्हणत ऐनवेळी एकनाथ खडसेंनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या या निर्णयावर बरीच टीका करण्यात आली. आता त्यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी खोचक टीका केली आहे.
एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे केंद्रात भाजपच्या मंत्री आहेत. त्यांचे पॅनल निवडून यावे, यासाठी त्यांनी माघार घेणे स्वाभाविक आहे. खडसे सोयीचं राजकारण करतात. भुसावळमध्ये ते शिवसेना-भाजप विरुद्ध लढत आहेत. मग मुक्ताईनगरमध्ये भाजप विरुद्ध लढायला काय अडचण आहे? असा सवाल गुलाबराव पाटलांना उपस्थित केला आहे. एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर नगरपंचायतीत घेतलेल्या माघारीबाबत पाटील यांनी खडसेंवर टीका करत सवाल उपस्थित केला.
राष्ट्रवादी पक्षाला उत्तर महाराष्ट्रात वाढवेल, असं सांगून एकनाथ खडसेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि विधान परिषद घेतली. पण, आता मुक्ताईनगरमध्येच राष्ट्रवादी राहिली नाही, असं म्हणावं लागेल, असा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे. त्यामुळे त्यांच्या या टीकेला खडसे काय प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागेल.















Discussion about this post