पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. डीजे बंदीच्या मागणीवरून पुण्यासह राज्यात चर्चा सुरू असतानाच मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतःचा अनुभव सांगत ध्वनीप्रदूषणाच्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधले आहे.
पाटील यांनी सांगितले की, पुतण्याच्या लग्नसमारंभात उत्साहात नाचताना डीजेचा आवाज अत्यंत मोठा होता. या प्रचंड आवाजाचा त्यांच्या श्रवणक्षमतेवर परिणाम झाला असून एका कानाची ऐकण्याची क्षमता तब्बल ४० टक्क्यांनी कमी झाली आहे, असा दावा त्यांनी केला. स्वतःला आलेला हा अनुभव सांगत त्यांनी आगामी गणेशोत्सवात तरुणांनी डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
गणेशोत्सव हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. मात्र, या उत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा त्रास इतरांना होऊ नये, याचीही काळजी घेणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठ्या आवाजाचा त्रास होतो. त्यामुळे गणेश मंडळांनी ध्वनीची मर्यादा आणि त्याचे होणारे परिणाम गांभीर्याने विचारात घ्यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
केवळ डीजेच्या आवाजावरच नव्हे, तर गणेशोत्सवातील लेझर लाइट्सच्या वापराबाबतही गुलाबराव पाटील यांनी चिंता व्यक्त केली. लेझरच्या तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने मंडळांनी त्याचा वापर करताना काळजी घ्यावी, असे त्यांनी म्हटले.गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना उत्सवाचा जल्लोष कायम ठेवत पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याचाही विचार करण्याची गरज आहे. डीजे-डॉल्बीच्या भिंती हादरवणाऱ्या आवाजाऐवजी ढोल-ताशा आणि इतर पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणेशोत्सव साजरा करावा, असा संदेश पाटील यांनी तरुणाईला दिला.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी पुण्यात डीजे बंदीची मागणी पुढे रेटल्यानंतर या मुद्द्याला विविध स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. काही गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्त्यांनी या मागणीला विरोध केला आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवापूर्वी डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.














Discussion about this post