धुळे : राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असून याचा थेट परिणाम धरणांच्या जलसाठ्यावर होताना दिसत आहे. अनेक ठिकाणच्या धारणांमधील जलसाठ्यात घट झाली आहे. धुळे जिल्ह्यातील देखील काही धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आल्यामुळे आगामी काळात धुळे शहरासह जिल्ह्यात पाणी संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धुळे पाटबंधारे विभाग अंतर्गत लाटीपाडा, मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, करवंद, अनेर, सोनवद, अक्कलपाडा, वाडी शेवाडी, अमरावती, सुलवाडे हे महत्त्वाचे १२ मध्यम, तर सुमारे ४५ लहान- मोठे लघु प्रकल्प आहेत. गेल्या वर्षी दुष्काळाचे चटके सहन कराव्या लागलेल्या धुळे जिल्ह्यात गत हंगामात समाधानकारक पाऊस राहिल्याने जुलै महिन्यातच जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते, प्रकल्प भरल्याने नदी, नाले देखील तुडूंब भरून वाहत होते. नदी, नाल्यांना मोठे पूर देखील आले होते. यामुळे धुळेकरांची पाण्याची चिंता मिटली होती.
परंतु एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने जलसाठ्यांमध्ये निम्म्यावर पाणीसाठा ऊरला आहे. यामुळे आगामी काळात धुळे जिल्ह्यात पाणीबाणीचे संकट उभ राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अक्कलपाडा धरणातील पाणीसाठा ५५ टक्के शिल्लक असून, इतर कमी क्षमतेच्या धरणातील पाणीसाठ्यांची टक्केवारीसुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे या धरण क्षेत्र अंतर्गत असलेले हजारो हेक्टर सिंचन क्षेत्रही संकटात सापडले आहे.
Discussion about this post