जालना | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी येथून निघणार असून मुंबईत निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकार इतके नालायक असू शकते…आता मी शहीद झालो तरी माघार नाही. माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही असे मनोज जरांगे म्हणाले.
मराठ्यांच्या अंगावर आरक्षणाचा गुलाल लागणारच आहे. अंतरवलीतून मी जरी एकटा निघत असलो तरी मुंबईमध्ये तीन कोटी लोक येणार आहेत. मी गमिनी कावा करणार आहोत. सर्व काही आताच सांगणार नाही. आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे आम्ही केले आहेत. मराठ्यांनो आता ही शेवटची लढाई आहे. आता घरी राहू नको. जे मुंबईला जातील त्याला सोडण्यास इतर मराठ्यांनी जावे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. या आंदोलनात शेकडो मराठे शहीद झाले आहेत. अनेक माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले आहे. अनेक घरातील कर्ता पुरुष गेला आहे. परंतु त्यानंतर सरकारने आरक्षण दिले नाही. आपली मुले मरत असताना सरकारला झोप कशी येते? सरकार इतके नालायक असू शकते का? सरकार निर्दयी आहे. निष्ठूर आहे. मराठा समाजाबद्दल हा सर्व विचार करताना मला रात्ररात्र झोप येत नाही. यामुळे आता आरपारची लढाई करण्याचा निर्णय मी घेतला आहे.
आता मी शहीद झालो तरी माघार नाही. माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही. मराठयांसाठी टोकाचे पाऊल उचलणार आहे. सरकारच्या दारात मरण आले तरी आता माघार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही.
Discussion about this post