जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी परीक्षांचे निकाल तीस दिवसांच्या आत जाहीर होवू लागले आहेत. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना पत्र पाठवून केलेल्या आवाहनाला सर्व प्राध्यापकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
राज्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे निकालाच्या बाबतीत कायम अग्रेसर राहिले आहे. दरवर्षी ३० ते ४५ दिवसांत निकाल लागतात. विद्यापीठाने यावर्षी ऑनलाइन मूल्यांकनासाठी ७५ केंद्र स्थापन केले आहेत. वेळेच्या आत निकाल लागावेत यासाठी प्रा. माहेश्वरी यांनी प्राध्यापकांना पत्र लिहिले होते. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी तीनही जिल्ह्यात परीक्षेच्या बाबतीत कार्यशाळा घेतल्या.
विद्यापीठाच्या परीक्षा संपल्याच्या अंतिम तारखेपासून ३० दिवसांच्या आत बी.ए. (एमसीजे), एम.ए एम.सी.जे., बी. कॉम, बी.पी.ई., बी. एस्सी., बीएसडब्ल्यू, डीपीए, एमएमएस सीएम, एमएमएस सीएम (नवीन शैक्षणिक धोरणानुसार), एम.ए. मराठी, एम.ए हिंदी, एम.ए इंग्रजी, एम.एस्सी गणित, एम.एस्सी पर्यावरणशास्त्र, एम.एस्सी उपयोजित भू-विज्ञान, एम.एस्सी, एम.ए. भूगोल, एम.एस्सी संगणकशास्त्र, एम.एस्सी माहिती तंत्रज्ञान, एमबीए, एम.ए संरक्षणशास्त्र, एम.ए नाट्यशास्त्र, एम.ए संगीत, संगीत पदविका या सर्व परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर झाले आहेत. अद्याप काही परीक्षा सुरू असून सर्व परीक्षांचे निकाल लवकर जाहीर होतील, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न
विद्यापीठाचे प्राधिकरण सदस्य व विद्यार्थी संघटनांसमवेत विद्यापीठातर्फे बैठकी घेऊन कॉपीमुक्त परीक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी कॉपीच्या प्रमाणात घट झाली आहे. एप्रिल-मे २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत ८६५ कॉपी प्रकरणे होती. आताच्या परीक्षेत ४२६ कॉपी प्रकरणे झाली आहेत. विद्यापीठाने परीक्षांच्या मूल्यांकन कामात उत्तम कामगिरी करणाऱ्या समन्वयक आणि केंद्रप्रमुखांना प्रशस्तीप्रमाणपत्र देण्यास प्रांरभ केला आहे.















Discussion about this post