मुंबई । महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरु झाले असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे अजित पवार गटात सहभागी होत सत्ताधारी बाकावर बसले. त्यानंतर, विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. मात्र यानंतर मलिक यांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत त्यांचा समावेश करून घेण्यास विरोध केला आहे.
सत्ता येते जाते, पण देश महत्वाचा. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामावून घेता कामा नये असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांमधील मतभेद समोर येऊ लागल्याची चर्चा होऊ लागली आहे.
काय आहे फडणवीसांचे पत्र?
माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.
परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे..” असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
“आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतू, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे.”
“त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.” असे फडणवीस या पत्रामध्ये म्हणालेत.
Discussion about this post