मुंबई । शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत आज सोमवारी पुण्यातील एस एम जोशी हॉलमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. मात्र यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मंत्री सावंत संतापले. पत्रकारांनाच आगीत तेल न ओतण्याचा सल्ला दिल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
मंत्री सावंत यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका पत्रकाराने त्यांना त्यांच्या एका विधानाची आठवण करून दिली. काही महिन्यांपूर्वी तुम्ही 2024 पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईल असे विधान केले होते. त्यामुळे तुम्ही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार का? असा प्रश्न या पत्रकाराने तानाजी सावंत यांना केला.
पत्रकाराचा हा जिव्हारी लागणारा प्रश्न ऐकताच तानाजी सावंत यांनी ‘चला’ म्हणत तेथून काढता पाय घातला. त्यानंतर पत्रकाराने आपल्या प्रश्नाचा पिच्छा पुरवला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नापासून तु्म्ही पळ काढत आहात का? असे तो म्हणाला. त्याचा हा प्रश्न ऐकताच संतापलेले तानाजी सावंत माघारी फिरले. त्यानंतर त्यांनी सदर पत्रकाराचा खांदा व गाल थोपटत मी पळत काढत नसल्याचे स्पष्ट केले.
मी पळ काढत नाही. पण जे चालले आहे, ते तुम्हीही पाहत आहात. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पत्रकारांनी आगीत तेल ओतण्याचे का करू नये एवढेच मी सांगतो, असे तानाजी सावंत म्हणाले आणि आल्यापावली परत निघून गेले. त्यांच्या या व्यवहाराची पुण्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.















Discussion about this post