अमळनेर : मुख्यमंत्री साहेब…. आम्हाला शासनाची कर्जमाफी नको, अनुदान नको, पीकविमाही नको पण आम्हाला आम्हाला शेतातील माल ने-आण करण्यासाठी रस्ता द्यावा, अशा मागणीच पत्र अमळनेर तालुक्यातील कलाली येथील शेतकऱ्यांनी लिहिलं आहे. शिवाय मागणी मान्य न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे हे गाव चर्चेत आलं आहे.
अमळनेर तालुक्यातील कलाली शिवारात सुमारे १०० शेतकऱ्यांची ४०० एकर बागायती शेती आहे. तापी नदीकाठावर खोऱ्यात ही शेती असल्याने उत्पन्न चांगले येते; मात्र या शेतातून माल ने-आण करण्यासाठी एकच रस्ता आहे.
तीन किमी रस्त्यात ‘खैऱ्या’ आणि ‘लेंढ्या’ असे दोन मोठे आणि आणखी आठ लहान नाले आहेत. त्यातच तापी काळावर चिकण माती आहे. त्यामुळे जून ते डिसेंबर या महिन्यांत या ठिकाणी दोन ते तीन फुटांचा चिखल असतो. शेतातून माल काढून आणण्यासाठी दोन ट्रॅक्टर एकत्रच जोडावे लागतात.
तरी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. विशेष म्हणजे या रस्त्यावरून एकच वाहन जाऊ शकत असल्याने शेतकऱ्यांना शेतात वाहने ने-आण करण्यासाठी रस्त्यात सूचना देण्यासाठी माणसे ठेवावी लागतात. एकीकडून वाहन येत असताना समोरून वाहन आले तर वाहन मागे घेणे अवघड असते, त्यामुळे पूर्वसूचना देण्यासाठी आवाज द्यावा लागतो की, एकीकडून वाहन येत आहे.
या परिसरात शेतकरी केळी, कापूस, पपई अशी बागायती पिके घेतात; मात्र सप्टेंबरपूर्वी माल ने-आण करताना हाल होऊ नयेत म्हणून ते उशिरा लागवड करतात; परंतु त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतात; तसेच मालाला उशिरा भाव मिळत नाही. काढलेला माल शेतातून घरी किंवा बाजारात नेण्यासाठी ३० ते ३५ टक्के फक्त वाहतूक खर्च येतो. मालाने भरलेले ट्रॅक्टर अनेकवेळा चिखलात फसतात आणि बाहेर काढण्यासाठी इतर दोन तीन ट्रॅक्टरचा सहारा घ्यावा लागतो. डिसेंबरनंतर रस्त्यावर धूळ साचलेली असते. या परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकवेळा शेतरस्त्याची मागणी केली; मात्र गाव निम्न तापी प्रकल्पात अंशतः बुडीत होणार असल्याने शासन रस्ता करून देत नाही. हा रस्ता केला असता तर सात्री गावाला देखील पर्यायी रस्ता उपलब्ध झाला असता. राजकीय नेते व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाने कुठलेही अनुदान, पीकविमा अथवा कर्जमाफी देऊ नका; मात्र आम्हाला शेतातील माल ने-आण करण्यासाठी रस्ता द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Discussion about this post