मुंबई । राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेमुळे ग्रामपंचायत निवडणुकांच्या कार्यक्रमाला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावागावातील नवीन कारभाऱ्यांसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.


राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासाठी मतदार याद्या हा महत्त्वाचा टप्पा आहे. सध्या मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षणाची प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेत हरकती आणि सुनावण्यांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम निश्चित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
निवडणुका कधी होणार?
SIRची प्रक्रिया पूर्ण होण्यास लागणारा वेळ लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणुका नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरअखेर जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया आणि त्यानंतरची कार्यवाही पाहता गावागावातील नवीन पदाधिकाऱ्यांना जानेवारी २०२७ पर्यंत वाट पाहावी लागू शकते, अशी चर्चा आहे.मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नसून निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होतो, याकडे इच्छुक उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक
दरम्यान, ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे आणि निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत, अशा ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प होऊ नये यासाठी सरकारने प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा केला आहे.ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर नियमित कार्यकारिणी अस्तित्वात नसल्याने गावातील विकासकामे, विविध मंजुरी आणि महत्त्वाचे प्रकल्प प्रभावित होण्याची शक्यता असते. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत किंवा पुढील काही कालावधीसाठी प्रशासकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा कारभार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इच्छुकांची धाकधूक वाढली
ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक इच्छुकांनी गावागावात तयारी सुरू केली आहे. मात्र निवडणुका लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे, विकासकामांना गती देण्यासाठी निवडणुका लवकर घेण्याची मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.आता ४ नोव्हेंबरची अंतिम मतदार यादी आणि त्यानंतर जाहीर होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुका यंदाच होणार की थेट २०२७ मध्ये नवीन कारभाऱ्यांच्या हातात गावची सत्ता जाणार, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post