जळगाव । भुसावळ शहरात लुटमारीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या धान्य व्यापाऱ्याला तिघा अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात अडवून लुटल्याची माहिती आहे. आरोपींनी व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकल्यानंतर लाकडी दांड्याने त्यांच्या डोक्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांच्याकडील दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड असलेली बॅग घेऊन आरोपी पसार झाले.
या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. ही घटना सोमवारी रात्री टीव्ही टॉवर परिसरात घडली.
अजय प्रेमचंद कोटेचा (५०, रा. टीव्ही टॉवर परिसर, भुसावळ) हे अण्णाभाऊ साठे मार्केटमध्ये धान्याचा व्यवसाय करतात. सोमवारी रात्री सुमारे ९ वाजता ते दुकान बंद करून त्यांचा १९ वर्षीय पुतण्या मीत कोटेचा याच्यासोबत दुचाकीवरून घरी निघाले होते.
भूमी अभिलेख कार्यालयाजवळ आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तिघा व्यक्तींनी त्यांचा पाठलाग सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने परिसरात अंधार होता. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी कोटेचा यांना रस्त्यात अडवले.
डोळ्यात मिरचीपूड, दांड्याने डोक्यात वार
आरोपींनी अचानक अजय कोटेचा यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. काही कळण्याच्या आतच त्यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला करण्यात आला. डोक्यावर जोरदार वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. यानंतर आरोपींनी त्यांच्या ताब्यातील रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. बॅगेत दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम असल्याची माहिती आहे. लूट केल्यानंतर तिन्ही आरोपी दुचाकीवरून तेथून फरार झाले.
या घटनेदरम्यान अजय कोटेचा यांचा पुतण्या मीत यालाही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी कोटेचा यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रात्री साडेअकराच्या सुमारास जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांच्यावर न्यूरोसर्जनच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे समजते.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. तसेच आरोपी कोणत्या दिशेने पसार झाले, याचीही माहिती घेतली जात आहे.दरम्यान, टीव्ही टॉवर परिसरातील बंद पथदिव्यांमुळे या घटनेत आरोपींना अंधाराचा फायदा मिळाल्याची चर्चा आहे. शहरातील संवेदनशील भागांमध्ये प्रकाशव्यवस्था सुरळीत करण्यासोबतच रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.या घटनेमुळे भुसावळ शहरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लुटीतील आरोपींना तातडीने अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.















Discussion about this post