नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनात्मक बदलांना वेग आला असून, पक्षाने नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी काम करणार आहे. नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
भाजपच्या नव्या कार्यकारिणीत माजी खासदार भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबईतील शिवप्रकाश यांची राष्ट्रीय सहसंगठन मंत्रीपदी फेरनिवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील खासदार विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्रीपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. तसेच सोशल मीडिया सहसंयोजकपदी प्रीती गांधी यांना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीत १३ उपाध्यक्ष
भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष असणार आहेत. विविध राज्यांना आणि प्रदेशांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या नव्या रचनेत करण्यात आला आहे. आगामी काळातील पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने या नियुक्त्यांना महत्त्व दिले जात आहे.
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे खासदार सतीश पूनिया यांच्याकडे राष्ट्रीय महासचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असतानाच घोषणा
विशेष म्हणजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असतानाच भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. फडणवीस यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही त्यांनी भेट घेतली.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील या फेरबदलामुळे पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर नव्या जबाबदाऱ्या निश्चित झाल्या असून, आगामी काळातील राजकीय रणनीतीच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.















Discussion about this post