मुंबई । गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६ हजार २११ खासगी कंपन्या बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी ही माहिती दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला आहे. याबाबत पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत राज्यातील औद्योगिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी विविध नागरी समस्यांमुळे स्थलांतराचा निर्णय घेतल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे २ हजारांहून अधिक कामगार कार्यरत असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. या समस्यांमुळे कंपन्यांनी स्थलांतराचा निर्णय घेणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी टिकवून ठेवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. चाकण, तळेगाव तसेच राज्यातील इतर औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे. रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी यासारख्या समस्या तातडीने सोडवाव्यात, तसेच MIDC, PMRDA, PWD आणि NHAI यांच्यात समन्वय साधून एकात्मिक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.
उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेऊन त्या वेळेत सोडवण्यासाठी विशेष ‘एक खिडकी’ यंत्रणा उभारण्याची मागणीही पवार यांनी केली आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील ३६ हजार २११ खासगी कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आल्याचे पवार यांनी म्हटले आहे. मात्र, या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का, याची माहिती सरकारदरबारी उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
“महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिले आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे स्थलांतर होणे किंवा ते बंद होणे आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही,” असे पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिलेला वारसा असून, तो टिकवण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांनी पार पाडावी, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.















Discussion about this post