मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनावरून विरोधकांवर टीका केल्यानंतर आता तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आजच्या पिढीतील काही हिंदू तरुणींविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. तिच्या पोस्टनंतर अनेक नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगना रनौतने स्वतंत्र महिलांविषयी आपले मत मांडताना लिहिले की, “खऱ्या अर्थाने स्वतंत्र महिला स्वतःचा मार्ग स्वतः निवडतात, स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आयुष्य घडवतात. त्या पालकांच्या किंवा कुटुंबाच्या आधारावर जगत नाहीत.”
यानंतर तिने आजच्या पिढीतील काही तरुणींवर टीका करत त्यांना “जनरेशन गटार” असे संबोधले. कंगनाने असा दावा केला की, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव स्वीकारलेल्या काही भारतीय तरुणी शिक्षण, व्यक्तिमत्त्व आणि जबाबदारी या बाबतीत कमी पडतात. तसेच अशा तरुणी स्वतःला स्वतंत्र समजत असल्या तरी त्यांचे वर्तन समाजासाठी आदर्श नसल्याचेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
कंगनाने पुढे असेही नमूद केले की, अनेक तरुणी स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसतानाही पालकांच्या कमाईवर जगतात आणि स्वतःला स्वतंत्र समजतात. जबाबदाऱ्या स्वीकारल्याशिवाय खरे स्वातंत्र्य मिळत नाही, असे मतही तिने व्यक्त केले.
दरम्यान, कंगनाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या विधानावर टीका करत ते महिलांचा अपमान करणारे असल्याचे म्हटले. एका युजरने, “बहुतेक लोक या मताशी सहमत होणार नाहीत,” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने, “ज्या गोष्टींसाठी ती आज इतरांवर टीका करत आहे, त्याच गोष्टी तिच्या आयुष्यातही घडल्या आहेत,” असे म्हटले. आणखी एका नेटकऱ्याने, “तिने स्वतःचा भूतकाळ विसरला आहे का?” असा सवाल उपस्थित केला. काहींनी “तू देखील हेच करून शिकली आहेस,” असा टोला लगावत कंगनावर निशाणा साधला.
कंगनाच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर मतमतांतरे निर्माण झाली असून, तिच्या वक्तव्यावर समर्थक आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे.















Discussion about this post