मुंबई । देशभरात नीट आणि राज्यातील टीईटी पेपरफुटी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत गंभीर आरोप समोर आला आहे. अहिल्यानगर येथील ऋषिकेश गांगर्डे यांनी परीक्षेच्या दोन दिवस आधी काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि संभाव्य उत्तरे व्हॉट्सअॅपद्वारे पोहोचल्याचा दावा केला असून, या आरोपामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
गांगर्डे यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २२ मार्च २०२६ रोजी औषध निरीक्षक (वर्ग-२) पदासाठी परीक्षा घेतली होती. मात्र, या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न २० मार्च रोजीच काही उमेदवारांकडे व्हॉट्सअॅपद्वारे पोहोचले होते, असा त्यांचा आरोप आहे.
त्यांनी दावा केला की, व्हॉट्सअॅप चॅटमध्ये उमेदवारांना “७८ ते ८० प्रश्न बरोबर सोडवा आणि उर्वरित १० ते १२ प्रश्न मुद्दाम चुकीचे सोडवा” असा संदेश देण्यात आला होता. तसेच २०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेतील सुमारे ९० प्रश्न पर्यायांसह अचूक जुळले, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप
ऋषिकेश गांगर्डे यांनी सांगितले की, या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी ते पोलिसांकडे गेले होते. मात्र, पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याआधी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि संबंधित विभागाच्या मुख्य कार्यालयातही त्यांनी लेखी तक्रार सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक करावी आणि संपूर्ण रॅकेट उघड करावे, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत अद्याप महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) किंवा संबंधित तपास यंत्रणांकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्य चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.















Discussion about this post