मुंबई : पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) ने सहाय्यक (Assistant) पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत देशभरातील ५०० रिक्त पदे भरली जाणार असून, इच्छुक उमेदवार ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ही भरती राज्यनिहाय होणार असून उमेदवाराला फक्त एका राज्यासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ५७ पदांसाठी भरती होणार आहे. याशिवाय तामिळनाडू (४९), पश्चिम बंगाल (४६), राजस्थान (३६), केरळ (३५), गुजरात (३४), उत्तर प्रदेश (२४), दिल्ली (२०) आणि बिहार (१२) येथेही रिक्त जागा आहेत.
कोण करू शकतो अर्ज?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण केलेली असावी. १ जुलै २०२६ पर्यंत पदवी पूर्ण झाल्याचा पुरावा आवश्यक आहे.
तसेच, उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करणार आहे, त्या राज्याची प्रादेशिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे अनिवार्य आहे. अंतिम निवडीपूर्वी यासाठी भाषा चाचणी घेतली जाणार आहे.
वयोमर्यादा
किमान वय: २१ वर्षे
कमाल वय: ३० वर्षे (१ जुलै २०२६ रोजीच्या स्थितीनुसार)
अर्जदाराची जन्मतारीख २ जुलै १९९६ पूर्वीची किंवा १ जुलै २००५ नंतरची नसावी. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) आणि दिव्यांग (PwD) उमेदवारांना नियमानुसार ३ ते १३ वर्षांपर्यंत वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.
अर्ज शुल्क
SC/ST, PwD आणि माजी सैनिक: शुल्क नाही.
इतर सर्व उमेदवार: ₹८५० अर्ज शुल्क.
इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा. सरकारी विमा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधरांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.















Discussion about this post