मुंबई । दिल्लीतील जंतरमंतर येथे NEET परीक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सीजेपीच्या (CJP) आंदोलनात पोलिसांनी दिलेल्या अमानुष लाठीमाराचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. या हिंसक कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. या बंदमध्ये सर्व विरोधी पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
“दिल्लीत जनरल डायर पुन्हा जिवंत झाला!”
पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार घणाघात केला. “दिल्लीत तरुण आंदोलकांवर अमानुष लाठीमार करून सरकारने दडपशाही सुरू केली आहे. दिल्लीत जणू ‘जनरल डायर’ पुन्हा जिवंत झाला आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) लोकशाही मानत नाही, त्यांचा ठोकशाहीवर विश्वास आहे. मात्र, अशा जनआंदोलनाला भलेभले डायर घाबरतात. सर्वसामान्य जनतेचा हा राग आता रस्त्यावर आलाच पाहिजे,” असे आंबेडकर म्हणाले.
NEET परीक्षेच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह
NEET परीक्षा प्रक्रियेवर ताशेरे ओढताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “पहिली परीक्षा चुकीच्या पद्धतीने पार पडली आणि आता घेतलेल्या फेरपरीक्षेतही अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. हा देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थेवरच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून या धोरणाविरोधात आता देशभरात जनआंदोलन उभे राहण्याची गरज आहे.”















Discussion about this post