धुळे । अजमेर येथे देवदर्शन करून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या इनोव्हा कारचा धुळे जिल्ह्यात भीषण अपघात झाला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळ झालेल्या या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील एक कुटुंब इनोव्हा कारने अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परत येत असताना शिरपूर फाट्याजवळ भरधाव वेगातील कारवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली कार महामार्गावरील दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत घुसली आणि समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकला जोरदार धडकली.
धडकेने कारचा चक्काचूर
धडक इतकी भीषण होती की इनोव्हा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य राबविण्यात आले.
पाच जणांवर उपचार सुरू
अपघातात जखमी झालेल्या पाचही जणांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांची ओळख आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.
देवदर्शन करून आनंदाने घरी परतणाऱ्या कुटुंबावर वाटेतच काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अपघातामुळे काही काळ मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.















Discussion about this post