जळगाव । जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी झाली आहे. पहिल्याच पावसानंतर जिल्ह्यातील तब्बल ८ हजार ५१० ग्रामस्थांना टंचाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ९ जुलैपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील टंचाई पूर्णपणे संपलेली नसून अद्यापही ३८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक २५ टँकर एकट्या जामनेर तालुक्यात धावत आहेत.
पाऊस सुरू होण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत जिल्ह्यात ३९ टँकर सुरू केले होते, तर ६५ विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. पाऊस झाल्यानंतर काही गावांमधील टंचाई दूर झाल्याने प्रशासनाने टँकर आणि विहिरींची संख्या कमी केली आहे. सद्यस्थितीत टँकरची संख्या ३९ वरून ३८ वर आली आहे. तर अधिग्रहित विहिरींची संख्या ६५ वरून ६४ वर आली आहे.
जामनेर तालुक्यात सर्वाधिक टंचाई
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या ३८ टँकरपैकी सर्वाधिक टँकर जामनेर तालुक्यात (२५ टँकर) सुरू आहेत. याशिवाय अमळनेर तालुक्यात ९, पारोळा तालुक्यात ३ आणि भुसावळ तालुक्यात १ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
अधिग्रहित विहिरींच्या माध्यमातून सध्या १ लाख ३४ हजार १०४ ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. जामनेरमध्ये २६, धरणगावमध्ये ४, एरंडोलमध्ये एक, भुसावळात २, यावल १, मुक्ताईनगर १७, बोदवड ३, पाचोरा २, चाळीसगाव ३, अमळनेर १९, पारोळा ३ व चोपडा तालुक्यातील अधिग्रहित २ विहिरी कायम आहेत.
या उपाययोजनांच्या माध्यमातून १ लाख ३४ हजार १०४ ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. काही गावांमधील टंचाई दूर झाली असून प्रशासनालाही टँकर आणि अधिग्रहित विहिरींची संख्या कमी करता आली आहे. पहिल्याच पावसानंतर तब्बल ८ हजार ५१० ग्रामस्थांना पाणीटंचाईतून दिलासा मिळाल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पावसामुळे काही गावांतील पाणीटंचाई कमी झाली असली, तरी अनेक भागांत अद्यापही टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत आणखी गावांमधील पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.















Discussion about this post