जळगाव । भुसावळ, जळगाव आणि नाशिक मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि गर्दी लक्षात घेऊन बडनेरा–नाशिक रोडदरम्यान धावणाऱ्या अनारक्षित दैनिक विशेष मेमू रेल्वेच्या परिचालन कालावधीत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
पूर्वी ही विशेष रेल्वे केवळ १५ जुलैपर्यंतच धावणार होती. सणासुदीचा काळ आणि आगामी गर्दीचा विचार करता रेल्वे प्रशासनाने या सेवेला मुदतवाढ दिली आहे. गाडी क्रमांक ०१२११/१२ बडनेरा-नाशिक रोड- बडनेरा विशेष मेमू ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत धावणार. विस्तारित कालावधीत या दोन्ही गाड्यांच्या मिळून एकूण १३४ फेऱ्या होणार आहेत. विशेष म्हणजे, या गाडीच्या वेळापत्रकात, मार्गात किंवा निर्धारित थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच ठरलेल्या वेळेत प्रवास करता येईल.
‘या’ मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा
बडनेरा–नाशिक रोड विशेष मेमू रेल्वेला गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर दररोज नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. या मुदतवाढीमुळे अमरावती, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, पाचोरा, कजगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक रोड या स्थानकांवरील हजारो दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.















Discussion about this post