चाळीसगाव । पाचोऱ्याकडून गुजरातकडे निघालेल्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे भीषण अपघात झाला. धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गायरान फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी ट्रॅव्हल्समध्ये एकूण २२ प्रवासी प्रवास करत होते. अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमी सहा प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मदतकार्य वेगाने पार पडले आणि मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, अपघातात ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले असून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. अपघाताची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.














Discussion about this post