जळगाव । राज्यात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून, यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या पुन्हा चिरफळ्या उडणार असल्याचा कयास लावला जात आहे. या संभाव्य फुटीचा धसका घेत उद्धव ठाकरेंनी तातडीने मुंबईत आपल्या खासदारांची बैठक बोलावली आहे. या सर्व घडामोडींवर जळगावात बोलताना महायुतीचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत सूचक विधान करत खळबळ उडवून दिली आहे. “ममता बॅनर्जींचे खासदार फुटलेच ना? मग कितीही रोखण्याचा प्रयत्न केला, तरी ज्याला जायचं तो जातोच!” अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी ठाकरे गटाच्या भीतीवर बोट ठेवले आहे.
‘ऑपरेशन टायगर’बाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “बैठक घेणे हे प्रत्येक पक्षाच्या नेत्याचे काम आहे. आमच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ वगैरे असं काही सुरू नाही आणि आम्ही कोणाला ‘शिवसेनेत या’ असंही म्हणत नाही आहोत. मात्र, लोक स्वतःहून इकडून तिकडे का जात आहेत? याचा अभ्यास करण्याची गरज आहे.” पुढे बोलताना त्यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे (TMC) उदाहरण देत, जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा कोणीही कोणाला रोखू शकत नाही, असा थेट इशारा ठाकरे गटाला दिला.
संजय राऊत हे काय ‘पश्चातापाचे महामेरू’ आहेत का?
“ज्यांना आमच्यासोबत येऊन पश्चात्ताप झाला असेल, त्यांनी पुन्हा ‘मातोश्री’वर यावं,” या संजय राऊतांच्या विधानाचा गुलाबराव पाटलांनी चांगलाच समाचार घेतला. “कोणाला पश्चाताप झालाय? संजय राऊत हे काय पश्चातापाचे महामेरू आहेत का? उलट आता राऊतांनाच पश्चाताप होतोय की काय, असे मला वाटायला लागले आहे,” असा जबरदस्त टोला त्यांनी लगावला.
जळगावमधील रेश्मा काळे यांच्या बंडखोरीबाबत बोलताना पाटील म्हणाले, “बंडखोरीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात होता. आता त्यांच्या आदेशानुसार आज महायुतीच्या बैठकीत अधिकृत घोषणा केली जाईल. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने मैदानात उतरलो आहोत.”















Discussion about this post