मुंबई । शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या या आंदोलनात सरकारने कर्जमाफीतील जाचक अटी मागे घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
रोहित पवार यांनी सांगितले की, डॉक्टरांनी त्यांचा रक्तदाब सामान्य असल्याचे सांगितले असले तरी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. तरीही शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी रोहित पवार यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. मात्र, केवळ चर्चा नव्हे तर मागण्यांवर ठोस निर्णय होणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनातून माघार घेण्यास नकार दिला.
मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा
रोहित पवार यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिले. शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हणणाऱ्या मंत्र्यांशी संवाद साधण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. “२०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाच पुन्हा ५० हजार रुपयांपर्यंतची मदत देणे म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आहे. आज अजितदादा सत्तेत असते तर असा जीआर निघालाच नसता,” असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांवरही टीका करत, “त्यांना कर्जमाफीचा जीआर तरी वाचता येतो का?” असा सवाल उपस्थित केला.
सरकारला उद्या अल्टिमेटम
सरकारला आज अल्टिमेटम देणार नसल्याचे सांगत रोहित पवार यांनी उद्या अंतिम भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. “सरकारच्या कर्जमाफीतील फसवेपणा आता शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे पुढे काही घडल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला बैल आजारी निघाला होता, त्याप्रमाणेच सरकारची कर्जमाफीही ‘आजारी’ असल्याची टीका करत त्यांनी सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. आता सरकार या आंदोलनावर कोणता तोडगा काढते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेते, याकडे राज्यभरातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post