मुंबई । बारावीच्या निकालात यश मिळवलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदा प्रथमच गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकत्र देण्याचा निर्णय घेतलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला छपाईतील मोठ्या त्रुटीचा सामना करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांवर छायाचित्रे मुद्रित न झाल्याचे आढळून आल्याने मंडळाने तातडीने दुरुस्ती प्रक्रिया सुरू केली आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेला राज्यभरातून १४ लाख ३३ हजार ५८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र निकालानंतर काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांवर फोटो नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. ही बाब लक्षात येताच संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना नव्याने छायाचित्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शाळांना फोटो पुन्हा अपलोड करण्याच्या सूचना
मंडळाने स्पष्ट केले आहे की, ज्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर फोटो छापला गेला नाही किंवा फोटो अस्पष्ट आहे, त्यांच्या छायाचित्रांची नव्याने नोंद करावी लागणार आहे. यासाठी फोटो JPG स्वरूपात पाठवणे बंधनकारक करण्यात आले असून प्रत्येक फाइलला संबंधित विद्यार्थ्याचा सीट नंबर नाव म्हणून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच फोटोचा आकार ५० केबीपेक्षा कमी ठेवण्याचेही निर्देश आहेत.
नव्या प्रणालीमुळे निर्माण झाली अडचण
यावर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रथमच गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकाच दस्तऐवजात देण्यात आले. या दस्तऐवजात विद्यार्थ्यांचा फोटो आणि QR कोडचा समावेश करण्यात आला होता. कागदपत्रांची पडताळणी सुलभ व्हावी आणि बनावट प्रमाणपत्रांना आळा बसावा, हा या निर्णयामागील उद्देश होता.
मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटावरील छायाचित्रांमध्ये त्रुटी आढळल्याने मंडळाने यापूर्वीच शाळांना फोटो दुरुस्तीची संधी दिली होती. मार्च-एप्रिल २०२६ दरम्यान विशेष पोर्टल सुरू करून फोटो व नावातील चुका दुरुस्त करण्याची अंतिम मुदतही देण्यात आली होती. तरीही काही ठिकाणी माहिती अद्ययावत न झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
विद्यार्थ्यांना महत्त्वाचे आवाहन
मंडळाने विद्यार्थी आणि पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गुणपत्रिकेवर फोटो नसल्यास, चुकीचा फोटो छापला गेल्यास किंवा छायाचित्र अस्पष्ट असल्यास विद्यार्थ्यांनी तातडीने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा. तसेच आवश्यक असल्यास विभागीय मंडळ कार्यालयात तक्रार नोंदवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, छपाईतील या त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाने दुरुस्ती प्रक्रिया वेगाने सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.















Discussion about this post