मुंबई । राज्यसभेच्या रणधुमाळीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लागले आहे. येत्या १३ मे रोजी विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत असून, या रिक्त होणाऱ्या जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘क्रॉस वोटिंग’ आणि ‘राजकीय खेला’ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
जागांचे गणित आणि संख्याबळ
सध्याच्या संख्याबळानुसार, ९ पैकी बहुतांश जागा सत्ताधारी महायुतीच्या खिशात जाण्याची चिन्हे आहेत. मात्र, अतिरिक्त मतांची जुळवाजुळव कोणाचे पारडे जड करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
भाजप: ५ जागांवर दावा.
शिवसेना (शिंदे गट): २ जागा.
राष्ट्रवादी (अजित पवार गट): १ जागा (यांच्याकडे १३ अतिरिक्त मते आहेत).
महाविकास आघाडी (MVA): १ जागा निश्चित (१७ अतिरिक्त मते असून, आणखी १० मतांची गरज).
उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
महाविकास आघाडीमध्ये सध्या जागावाटपावरून खलबतं सुरू आहेत. राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी माघार घेत शरद पवार यांच्यासाठी जागा सोडली होती. आता त्याची ‘परतफेड’ म्हणून उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवावे, अशी मागणी जोर धरत आहे.
काँग्रेस आपल्या कोट्यातून जागेसाठी आग्रही आहे, मात्र उद्धव ठाकरेंच्या नावाला पाठिंबा दिल्यास काँग्रेसची गणिते बिघडू शकतात. जर मविआने १० अतिरिक्त मतांची गोळाबेरीज केली, तर त्यांचे दोन सदस्य निवडून येऊ शकतात. मात्र, यासाठी मोठी राजकीय कसरत करावी लागणार आहे.
दुसरीकडे अजित पवार गटाकडे असलेली १३ अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीतील १७ अतिरिक्त मते कोणाकडे वळतात, यावर नवव्या जागेचा निकाल अवलंबून असेल. भाजपकडून पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने अतिरिक्त जागा खेचून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.















Discussion about this post