मुंबई । महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून देशातील टोल वसुली प्रणाली पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. १० एप्रिलपासून टोल नाक्यांवर रोख रक्कम स्वीकारणे बंद केले जाणार असून वाहनधारकांना टोल भरण्यासाठी डिजिटल पद्धतीचाच वापर करावा लागणार आहे.
नवीन व्यवस्थेनुसार टोल भरण्यासाठी प्रामुख्याने फास्टॅगचा वापर करणे आवश्यक ठरणार आहे. जर एखाद्या वाहनात फास्टॅग नसेल किंवा तो कार्यरत नसेल, तर चालकाला यूपीआयद्वारे टोलची रक्कम भरावी लागणार आहे. या बदलामुळे टोल प्लाझांवरील गर्दी आणि वेळेचा अपव्यय कमी होऊन वाहतूक अधिक सुरळीत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, सक्रिय फास्टॅग नसल्यास चालकाला सामान्य शुल्कापेक्षा सुमारे २५ टक्के अधिक रक्कम भरावी लागू शकते. तसेच फास्टॅग किंवा यूपीआयद्वारे टोल भरण्यास नकार दिल्यास संबंधित वाहनाला पुढे जाण्यापासून रोखले जाऊ शकते. अशा प्रकरणांत वाहनधारकाला ई-नोटीस पाठवली जाणार असून तीन दिवसांत रक्कम न भरल्यास दंडाची रक्कम दुप्पट करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
यासोबतच खासगी वाहनांमध्ये सरकारी ओळखपत्र दाखवून टोलमधून सूट घेण्याची सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. आता केवळ अधिकृतरीत्या सूट मिळालेल्या वाहनांनाच टोल न देता पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे टोल सवलतीचा गैरवापर कमी होऊन प्रणाली अधिक पारदर्शक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post