प्रहारचे दिग्गज नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर भाजप आमदाराच्या भावाचा अपघाताचा बनाव करून खून करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे अमरावतीसह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे भाऊ अभिजित तायडे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, बच्चू कडू यांनी कट रचून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शुभम ऊर्फ गोलू माहोरे याचाही सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीसोबत संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग आणि इतर काही पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आले असून ते न्यायवैद्यकीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. चांदूर बाजार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ५५, ५८ आणि ६१ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार आणि अटकेची शक्यता आहे का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post