नवी दिल्ली । इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जागतिक बाजारात तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या परिस्थितीचा परिणाम भारत वरही होत असताना केंद्र सरकारने देशांतर्गत उद्योग आणि शेती क्षेत्राला दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
केंद्र सरकारने अत्यावश्यक कच्च्या मालावरील आयात शुल्क थेट शून्यावर आणण्याचा निर्णय घेतला असून अमोनियम नायट्रेटसह अनेक पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील शुल्क माफ करण्यात आले आहे. ही सवलत २ एप्रिल ते ३० जून या कालावधीत लागू राहणार असून यामुळे खत आणि रासायनिक उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.
युद्धामुळे पुरवठ्यावर निर्बंध येऊन उत्पादन खर्च वाढत असताना सरकारच्या या निर्णयामुळे कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी होणार आहे. विशेषतः खत उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या अमोनियम नायट्रेटवरील कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकरही हटवण्यात आल्याने खत क्षेत्राला अतिरिक्त लाभ मिळणार आहे.
दरम्यान, मध्य-पूर्वेतील तणावामुळे होर्मुज खाडी मार्गे होणाऱ्या जहाज वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. भारतातील काही जहाजे या मार्गावर अडकली असल्याने एलपीजी गॅससह इतर पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे.
युद्धाची तीव्रता वाढण्याचे संकेत मिळत असल्याने केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून देशातील उद्योग आणि नागरिकांवर परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.















Discussion about this post