जळगाव । हवामान विभागाने जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सोमवारी सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला असून ढगांची दाटी, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली. शहरात या पावसामुळे मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची एकच धांदल उडाली. रस्त्यावरील विक्रेत्यांनी आपला माल वाचवण्यासाठी मोठी धावपळ केली.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या जळगावकरांना मात्र या पावसामुळे दिलासा मिळाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून वातावरणात सुखद बदल जाणवला.मात्र, या बदलत्या हवामानामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ३० आणि ३१ मार्चदरम्यान वादळी वारे, पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. सध्याच्या घडामोडींवरून हा अंदाज खरा ठरत असल्याचे चित्र आहे. पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post