मुंबई । भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी अखेर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राजीनाम्याच्या पत्रात चाकणकर यांनी नमूद केले की, “मी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. तो स्वीकारावा,” अशी विनंती त्यांनी केली आहे.
या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या राजीनाम्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी पक्षांतर्गत घडामोडींना यामुळे वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर राजीनाम्याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे कि, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.
तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच, असे चाकणकर यांनी एक्सवर म्हटले आहे.
खरात प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.














Discussion about this post