पुणे । मार्चअखेर राज्याचा पारा चाळीशी पार जात असतानाच आता हवामानात मोठा बदल झाला आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक होरपळत असतानाच राज्यावर आता अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने पुढील ३ ते ४ दिवस राज्याच्या विविध भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
या भागात पावसाचा अलर्ट?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या पाच जिल्ह्यांमध्ये हवामानातील बदल सर्वाधिक जाणवणार आहेत. यासोबतच दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि सातारा घाट परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील चार दिवस ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागांत पावसासोबत गारपीट होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांसमोर पिकांच्या नुकसानीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. गेल्या काही दिवसांत राज्याच्या काही भागात झालेल्या गारपिटीमुळे आधीच पिकांचे नुकसान झाले असून, पुन्हा तशीच स्थिती निर्माण झाल्यास अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ऊन आणि पावसाचा ‘डबल अटॅक’ –
एकीकडे कडक ऊन आणि दुसरीकडे अचानक येणारा पाऊस व वादळी वारे यामुळे वातावरण अस्थिर झाले आहे. या दुहेरी हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून, दमट हवामानामुळे अस्वस्थता वाढली आहे. हवामानाचा हा अनिश्चित पॅटर्न पुढील काही दिवस कायम राहणार असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आणि पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.















Discussion about this post