जळगाव/मुंबई । राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून उन्हाचा कडाका कमी झाला आहे. हवेत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आजही दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यवतमाळ येथे ३८ अंश सेल्सिअस तर अकोला येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले. तर जळगावातील पारा घसरला असून तापमान ३४ अंशाखाली घसरले आहे. दरम्यान महाबळेश्वर आणि मालेगाव येथे राज्यातील नीचांकी १५ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
आज या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?
आज धाराशिव, लातूर, नांदेड तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना आणि विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जळगाव जिल्ह्यात मागच्या तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे शेतातील उभे पीक आडवे पडले आहे. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.
“पंचनामे केव्हा होणार? नुकसान भरपाई कधी मिळणार?” असे सवाल उपस्थित करत शेतकरी प्रशासनाकडे मदतीची मागणी करत आहेत. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत असून सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.















Discussion about this post