विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य-पूर्वमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिस्थितीचा परिणाम आता शिक्षण क्षेत्रावरही दिसून येत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मोठा निर्णय घेत बारावीच्या काही परीक्षा रद्द केल्या आहेत.
सीबीएसई बोर्डाने पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांसह एकूण सात देशांमधील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ मार्च ते १० एप्रिलदरम्यान होणारे सर्व पेपर रद्द करण्यात आले असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
सीबीएसईच्या माहितीनुसार, युद्धामुळे त्या भागातील परिस्थिती गंभीर बनली असून परीक्षा घेणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे सध्या शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्यावर होणारा मानसिक ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच निकालासाठी कोणते निकष वापरले जाणार याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.
बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमधील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. स्थानिक शाळा आणि शिक्षण अधिकाऱ्यांकडून अभिप्राय घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाने सांगितले.
दरम्यान, १, ३, ५, ७ आणि ९ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आधीच पाच वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, युद्धामुळे परिस्थिती अजून काही काळ गंभीर राहण्याची शक्यता असल्याने अखेर सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.














Discussion about this post