मुंबई । महापालिका निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटला तरी भिवंडी महापौरपदाचा तिढा कायम आहे. मात्र आता भिवंडीत भाजपमध्येच उभी फूट पडलीय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.
महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत मतभेद उघडकीस आले असून याच दरम्यान, काँग्रेसनं भाजपच्या नारायण चौधरींसह 9 नगरसेवकांना गळाला लावून भाजपला धक्का दिलाय. त्यामुळे सत्तास्थापनेची समीकरणे पुन्हा बदलू लागली आहेत.
खरंतर भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेस ३० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १२ जागा मिळाल्या. भाजपकडे २२ तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडे १२ नगरसेवक निवडून आले. बहुमतासाठी आवश्यक असलेला ४६ चा आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांकडून पडद्यामागील हालचाली सुरू झाल्या.
याच दरम्यान २२ जागा असलेल्या भाजपनंही सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या. तर १२ जागा असलेल्या शिंदेसेनेनं भिवंडी विकास आघाडीचे ३ आणि कोणार्क आघाडीचे ४ नगरसेवक सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु केले होते. यात विशेष गोष्ट म्हणजे नारायण चौधरींची महापौरपदासाठी उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच स्नेहा पाटील यांना महापौरपदाची उमेदवारी देण्यात आली. आणि तिथंच ठिणगी पडली.
भाजपने महापौरपदासाठी स्नेहा पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजीचे सूर उमटले. नारायण चौधरी यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे असतानाच उमेदवारीत झालेल्या बदलामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढल्याचे बोलले जाते. त्यानंतर चौधरी यांनी इतर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याने चर्चांना अधिक उधाण आले. आता काँग्रेसनं आपला महापौरपदाचा उमेदवार तारीक मोमीन यांना माघार घ्यायला लावल्यास एक प्रकारे नारायण चौधरींच्या रुपाने भाजपचाच महापौर होण्याची शक्यता आहे. कारण नारायण चौधरींनी महापौरपदावर कॉम्प्रमाईज केलं नसल्याचं संकेत हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.
राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महापौर निवड झाल्यानंतरही भिवंडीला महापौर मिळाला नाही आता नारायण चौधरी काँग्रेससोबत गेल्यानं काँग्रेसचा महापौरपदाचा उमेदवार माघार घेणार की नारायण चौधरींच्या माध्यमातून भाजपच महापौरपद पटकावणार. याचीच उत्सुकता आहे.















Discussion about this post