मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली. राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी भेट घेतली. या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर ही दोन्ही नेत्यांची पहिलीच अधिकृत भेट असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये विविध राजकीय विषयांवर चर्चा झाली. विशेषतः कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसे नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल शिंदे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानल्याची चर्चा आहे.
यावेळी महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहील, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या भेटीवर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट ही सामान्य बाब आहे. एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे या भेटीत आक्षेपार्ह असे काही नाही. एका पक्षप्रमुखाने उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात विशेष अर्थ काढण्याची गरज नाही.”
या भेटीमागील राजकीय गणित काय, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असले तरी अधिकृतरीत्या कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र, राज्यातील आगामी राजकीय घडामोडींवर या भेटीचा परिणाम होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post