मुंबई । राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते जिंतेद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त दरवर्षी अनेक कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांना भेटायला येतात. मात्र यंदा आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे. तसेच फोन बंद करुन अज्ञातस्थळी जाणार असल्याचेही सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका ट्वीटची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत यंदा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितले आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे संपूर्ण ट्वीट…
उद्या 5 ऑगस्ट… माझा वाढदिवस. लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकत 5 तारखेला मिळते. पण मला माफ करा. ह्या 5 तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही… असे त्यांनी या ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे.
देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असे मला अजिबात वाटत नाही.
तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकत आहे. हीच माझी संपत्ती आहे. पण तरिही मला माफ करा. मी आज रात्री बारापासून ते उद्या रात्री बारापर्यंत स्वतःचा फोन बंद करून मी अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे.
लोक किती स्वार्थी असतात हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया माफ करा. मी उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे असे भावनिक ट्वीट त्यांनी केले आहे.
Discussion about this post