नागपूर । राज्यामधील अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून चिमुकल्यांसह महिला अन् वयोवृद्ध व्यक्तींवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनावेळी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या संख्येवरून जोरदार चर्चा झाली. या चर्चेवेळी बोलताना भाजप आमदाराने केलेल्या “भटक्या कुत्र्यांना पकडा अन् प्राणीप्रेमींच्या घरी सोडा” या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलेय.
राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी भटक्या कुत्र्यांच्या संख्येबाबत माहिती दिली. मुंबईत ९०,७५७ भटके कुत्रे आहेत. राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये एकूण १.१८८ दशलक्ष भटके कुत्रे आहेत. पण त्यांच्यासाठी शेल्टर होम मर्यादित आहेत. बीएमसीकडे आठ तर राज्यात फक्त १०५ शेल्टर होमची संख्या आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार लवकरच एक विशेष बैठक बोलवणार असल्याचेही मिसाळ यांनी सांगितले.
भाजप आमदाराच्या वक्तव्याने वाद
भटक्या कुत्र्यांवरील चर्चेदरम्यान भाजप आमदार महेश लांडगे यांनी प्राणीप्रेमींवर यावर उपाय शोधण्यात अडथळा आणल्याचा आरोप केला. मागील ३ वर्षांत पुण्यात एक लाखांहून अधिक कुत्रे चावण्याच्या घटना घडल्या आहेत. यांच्यावर उपाय शोधण्यात प्राणीप्रेमी नेहमीच अडथळा आणतात. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांना पकडून प्राणीप्रेमींच्या घरात सोडले पाहिजे, असे भाजप आमदार लांडगे म्हणाले.















Discussion about this post