मुंबई । भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला असून व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. या घोषणेसह, रेपो दर आता ५.५% वरून ५.२५% पर्यंत कमी झाला आहे. यामुळे आता गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या ईएमआयचा भार कमी होणार आहे
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने शुक्रवारी नवे पतधोरण जाहीर करताना रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केली. त्यानुसार रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो रेट आता 5.25 टक्क्यांच्या पातळीवर येऊन पोहोचला आहे. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्याचा रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. रेपो रेटमध्ये कपात झाल्याने आता सरकारी आणि खासगी बॅकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या दरात कपात केली जाऊ शकते. त्यामुळे सामान्य लोकांचा गृहकर्जाचा आणि वाहन कर्जाच्या मासिक हप्त्याची अर्थात ईएमआयची रक्कम घटण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यंदाच्या वर्षात आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये एकूण तीनवेळा कपात केली होती. त्यामुळे रेपो रेट 1 टक्क्याने खाली आला होता. यामध्ये आता आणखी 0.25 बेसिस पॉईंटची भर पडली आहे. फेब्रुवारीच्या बैठकीत आरबीआयने रेपो रेट 6.50 वरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी केले होते. चलनविषयक धोरण समितीने ही कपात जवळजवळ पाच वर्षांनी केली होती. दुसऱ्यांदा, एप्रिलच्या बैठकीत व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करण्यात आला. तिसऱ्यांदा, जूनमध्ये रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी करण्यात आला होता. त्यानंतर आता रेपो रेटमध्ये आणखी 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) बँकांना ज्या दराने कर्ज देते त्याला रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्याने आता बँकाना आणखी कमी व्याजाने कर्ज उपलब्ध होईल. याचा फायदा बँका आपल्या ग्राहकांनाही देऊ शकतील. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सरकारी आणि खासगी बँकांकडून गृहकर्जाचे व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी केले जाऊ शकतात. तसे घडल्यास हा सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरेल.















Discussion about this post