नाशिक । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. याच दरम्यान राज्यात पक्षांतराला वेग आला आहे. अनेक उमेदवार एका पक्षातून दुसरऱ्या पक्षात जाताना दिसून येत आहे. अशातच भाजपला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या सुमारे ५० पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाराजीतून त्यांनी पक्षाची साथ सोडली असल्याची माहिती आहे. दरम्यान, आणखी पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप पक्ष सोडण्याच्या मार्गावर असण्याची शक्यता आहे.
नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना (शिंदे सेनेची)युती झाली होती. भाजपला १५ ते २० जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र, केवळ चारच जागा मिळाल्यानं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळून आली. मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात शिवसेना निवडणूक लढवली जाणार आहे. शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असणार आहे. यामुळे भाजपच्या गोटात नाराजी अधिक वाढली आहे.
दरम्यान, या विषयी काही भाजप पदाधिकाऱ्यांनी, ‘भाजपला पूर्णपणे शिवसेना (शिंदे गटाच्या) खुंटीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे’, असा थेट आरोप केला आहे. गेल्या २५ वर्षांपासून मनमाड नगर परिषदेत भाजपचा एकही नगरसेवक निवडून येऊ न शकल्यामुळे पक्ष नेतृत्वाच्या कामगिरीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी भाजप पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अन्याय आणि पक्षाच्या संघटनात्मक दुर्लक्षाचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींचा निषेध म्हणून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्याकडे सामूहिक राजीनामे सादर केले आहेत. यामुळे मनमाडमधील भाजपची पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली असून, यामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.















Discussion about this post