बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने एक मोठी कारवाई केली आहे. भाजपने बिहारमधील ४ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टी करण्यात आलेले नेते राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात बिहार विधानसभा निवडणुकीत उभे राहिले आहेत. त्यामुळे पक्षाच्या हायकमांडने या चौघांविरोधात कारवाई केली.या नेत्यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. याबाबतचं पत्र देखील पक्षाने जारी केलं आहे.
पक्षाच्या हायकमांडने केलेल्या कारवाईत वरुण सिंह, अनूप कुमार, पवन यादव आणि सूर्यभान सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. वरुण सिंह हे बहादुरगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. अनूप हे गोपालगंज विधानसभातून निवडणूक लढत आहेत. दुसरीकडे पवन यादव आणि सूर्यभान सिंह हे अनुक्रमे कलहगांव , बडहरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
भाजपच्या आधी जनता दल युनायटेडने २ दिवसआधी १६ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पक्षाचे प्रदेश महासचिव चंदन कुमार सिंह यांनी या निर्णयाविषयी पत्र जारी केलं.
मुंगेरच्या जमालपूरमधील माजी मंत्री शैलेश कुमार, जमुईच्या चकाई येथील माजी आमदार संजय प्रसाद, सीवनच्या बडहरिया येथील माजी आमदार श्याम बहादूर सिंह, भोजपूरच्या बडहरा येथील माजी आमदार रणविजय सिंह, शेखपुराचे बरबीधाचे माजी आमदार सुदर्शन कुमार, बेगूसरायच्या साहेबपूर कलमाचे अमर कुमार सिंह, वैशालीचे महुआहून डॉ. आसमा परवीन, औरंगाबादच्या नवीनगर येथून लब कुमार, कटिहालच्या कदवा येथून आशा सुमन, चंपारण पूर्व येथून मोतिहारीमधील दिव्यांशू भारद्वाज,सीवानच्या जिरोदेई येथून विवेक शुक्ला, गोपालपूरचे आमदार नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल, कदवा येथील माजी मंत्री हिमराज सिंह, गया जी येथील माजी आमदार संजीव श्याम सिंह, गयाघाट येथील माजी आमदार महेश्वर प्रसाद यादव आणि मुजफ्फरपूर येथून प्रभात किरण यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.















Discussion about this post