मुंबई । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. याचा थेट परिणाम महाराष्ट्रात दिसून आला आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे थैमान दिसून येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भागातही जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवला असून, दक्षिण महाराष्ट्र वगळता राज्याच्या उर्वरित भागात विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आगामी दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असल्याचे चित्र असून, अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.हिंगोली जिल्ह्यातील औंढा व वसमत तालुक्यांमध्ये सकाळच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली. गावखेड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ नये, तसेच पूरस्थितीत उद्भवणारा संभाव्य अपघात टाळावा यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला. लातूर जिल्ह्यातही पावसाने थैमान घातले असून, शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल दिसत आहे. आज सकाळपासून जिल्ह्यातील उमरगा परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला असून नद्यांना व नाल्यांना पूर आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेड जिल्ह्यातही पावसाने सलग दुसऱ्या दिवशी जोरदार हजेरी लावली असून रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रस्त्यांवर पाणी वाहत असल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.
दरम्यान, विदर्भातही पावसाचा जोर कायम आहे. वर्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. समुद्रपूर तालुक्यातील कोरा गावात घर व गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसासह आलेल्या वाऱ्यामुळे घराचे छप्पर आणि गोठ्यावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे घरातील साहित्य पावसाच्या पाण्यात भिजून गेले आहे. या घटनेमुळे स्थानिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. काही ठिकाणी पूरनियंत्रण यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.















Discussion about this post