जळगाव | आदिवासी क्षेत्रांचा शाश्वत विकास साधण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत “धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” (DAJGUA) ही सहयोजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश आदिवासी गावांमध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रोजगार व मत्स्यव्यवसाय वृद्धींगत करून जीवनमान उंचावणे हा आहे.
या योजनेअंतर्गत साधारणपणे १०,००० समुदाय व १,००,००० वैयक्तिक लाभार्थ्यांचा समावेश करण्यात येणार असून त्यात अनुसूचित जमातींचे लाभार्थी, अविकसित क्षेत्रे व आदिवासी बहुल गावे यांचा प्राधान्याने समावेश आहे. अर्थसहाय्याच्या बाबतीत लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदान व १० टक्के हिस्सा स्वतःचा असा लाभ मिळणार आहे. यात ६० टक्के केंद्राचा आणि ४० टक्के राज्य शासनाचा हिस्सा असेल.
योजनेत मत्स्यसंवर्धन तलाव बांधकाम, नवीन मत्स्यसगोपन तलाव, इन्सुलेटेड वाहन, मोटारसायकल सह आईस बॉक्स, तीनचाकी वाहन सह आईस बॉक्स, फिश किऑस्क, जलाशयात मत्स्यबोटुकली संचयन, पिंजरा मत्स्यसंवर्धन, तसेच प्रशिक्षण व जनजागृती उपक्रमांचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात या योजनेसाठी १२ आकांक्षित तालुक्यातील ११२ गावे निवडण्यात आली असून, जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, जळगाव यांनी केले आहे. इच्छुकांनी जिल्हा मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.















Discussion about this post