जळगाव : महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला असून अशातच आज (20 जून) आणि उद्या (21 जून) रोजी राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. काही भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टी होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यातही वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
कोकणात मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका कायम
कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज, 20 जूनला, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, तर एखाद्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
20 आणि 21 जूनसाठी हवामान खात्याचा इशारा
पुणे, नाशिक, सातारा या घाटमाथ्यांवरील भागांत 20 जून रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, 21 जूनला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात डोंगर भागात असल्यामुळे दरडी कोसळणे, रस्ते बंद होणे यासारख्या घटना घडू शकतात. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी विशेष काळजी घ्यावी.
नाशिक शहरासह अहमदनगर, पुणे आणि कोल्हापूरसारख्या मैदानी भागात 20 जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र 21 जूनला या भागांतील पावसाचा जोर कमी होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. शेतीच्या दृष्टीने हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांचा कडकडाट
धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत 20 जून रोजी 40–50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. 21 जून रोजी या भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून, नंदुरबारमध्ये 22 तारखेला मध्यम पावसाचा अंदाज आहे.















Discussion about this post