पुणे । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसानंतर आता राज्यातील कमाल तापमानात वाढ व्हायला सुरूवात झाली असून उन्हाचे चटके पुन्हा जाणवून लागले आहेत. राज्यात उन्हाचा तडाखा कायम असून आजही काही जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट अंदाज हवामान खात्याने वर्तवला दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात सगळीकडेच उष्ण आणि आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. हवामान खात्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ वातावरण आणि उष्ण हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसंच, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा घाटमाथा, सांगली, संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, शुक्रवारी अकोला जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस तापमान होते. तर जळगाव, जेऊर, मालेगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अमरावती आणि वाशीम या ठिकाणी ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली. पुण्यात देखील तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता ४० अंश सेल्सिअसच्या वर पुण्यातील तापमान होते.
Discussion about this post