धुळे : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून कागदपत्र मागविण्यात येत आहेत. यासाठी २८ फेब्रुवारी अंतिम मुदत असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
सन २०२३ या खरीप हंगाम कापूस व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. हे लाभ केवळ सोयाबीन व कापूस पिकांसाठी देण्यात येत आहे. कागदपत्र जमा केल्यानंतर अर्थसहाय्याची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
यासाठी खरीप २०२३ मध्ये ई- पिक पाहणी केलेले कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी व ज्या शेतकऱ्यांनी खरीप २०२३ मध्ये ई- पिक पाहणी पोर्टलवर नोंद केलेली नाही. तथापि ज्यांच्या खरीप हंगाम २०२३ च्या सातबारा उताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे, असे खातेधारक डिजिटायझेड गावामधील खरीप 2023 कापुस व सोयाबीन उत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार या योजनेसाठी पात्र आहेत.
लाभासाठी कागदपत्र आवश्यक
खरीप हंगाम २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यात येत आहे. हा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदार शेतकरी यांनी आपले आधार कार्ड, संमतीपत्र व सामाईक खातेदार शेतकऱ्यांनी आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत संबंधित कृषि सहायक यांचेकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप यांनी केले आहे.















Discussion about this post