मणिपूरमधील परिस्थिती अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. येथे हिंसाचाराच्या घटना वारंवार होताना दिसत आहे. ताजी घटना म्हणजे ६ जणांच्या अपहरणानंतर त्यांचे मृतदेह सापडले आहेत, त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाल्याने संचारबंदी लागू करावी लागली आहे.येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
आंदोलकांनी रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या खाजगी निवासस्थानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे हिंसाचारग्रस्त राज्यात सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये आणखी एक मोठा संघर्ष झाला. पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या सुनेसह काही आमदारांच्या घरांचीही तोडफोड केली आणि त्यांची मालमत्ता जाळली. इम्फाळच्या विविध भागात आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर केला.
जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
नदीजवळून सापडलेल्या सहा मृतदेहांमध्ये आठ महिन्यांच्या अर्भकाचाही समावेश आहे. वास्तविक, मेईतेई समुदायाचे हे सर्व लोक सोमवारी निर्वासित छावणीतून बेपत्ता झाले होते. जिरीबाममधील बोकोबेरा येथून कुकी-जो अतिरेक्यांनी कथितपणे त्यांचे अपहरण केले होते जेव्हा सीआरपीएफची कुकी तरुणांच्या दुसऱ्या गटाशी चकमक सुरू होती. या चकमकीत ११ संशयित अतिरेकी मारले गेले.
माघार घेत असताना, अतिरेक्यांनी पोलीस ठाण्याजवळील मदत शिबिरातून तीन महिला आणि तीन मुलांचे अपहरण केल्याची माहिती आहे. सूत्रांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी मणिपूर-आसाम सीमेवरील जिरीबाम जिल्ह्यातील जिरीमुख या दुर्गम गावात नदीजवळ त्यांचे मृतदेह सापडले. शुक्रवारी रात्री हे मृतदेह आसाममधील सिलचर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आणि पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले. जिरीबाममध्ये ६ जणांचे मृतदेह सापडल्याच्या विरोधात खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत.
ईशान्येकडील राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता, इंफाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, बिष्णुपूर, थौबल, काकचिंग, कांगपोकपी आणि चुराचंदपूर जिल्ह्यात २ दिवस इंटरनेट बंद करण्यात आले आहे. इम्फाळ खोऱ्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराची नोंद झाली, कारण जमावाने अनेक आमदारांच्या घरांवर हल्ला केला आणि मालमत्तेची नासधूस केली.















Discussion about this post