जळगाव । नाविन्यपूर्ण संशोधनावर भर देतांना संशोधक विद्यार्थ्यांनी आवड, संयम, चिकाटी या वृत्तीतून गुणवत्तापूर्ण व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल असे नवे संशोधन करावे असे आवाहन कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेच्या वतीने दि. १८ व १९ सप्टेंबर रोजी “रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानातील नवीनतम विकासासाठी जागतिक संधी (GOLD CT)” या विषयावर दुसरी अंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून आयसीटी मुंबईचे माजी कुलगुरु प्रा.जी.डी.यादव यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने झाले. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून संबोधित करतांना कुलगुरू प्रा. माहेश्वरी बोलत होते. यावेळी दक्षिण आफ्रिकेतील प्रा.श्रीकांता जोन्नलगड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिष्ठाता प्राचार्य एस.एस. राजपूत, प्रशाळेचे संचालक प्रा.डी.एच.मोरे व निमंत्रक प्रा.डी.एस.दलाल, प्रा.पी.पी. माहुलीकर उपस्थित होते. प्रा. माहुलीकर हे महिनाअखेर सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सेवेचा गौरव करण्यासाठी ही परिषद होत आहे.
प्रा.माहेश्वरी म्हणाले की, मानवी अन्न, मानवी आरोग्य आणि मानवी सोय या संशोधनातील श्रेण्या आहेत. प्रत्येक टप्प्यावर यामध्ये प्रगती होत गेली. शोधनिबंध लिहिण्यात भारत हा जगात पाचव्या क्रमांकावर असला तरी या शोध निबंधाच्या गुणवत्तेत १५३ व्या स्थानावर आहे. संशोधन उध्दरण (सायटेशन) फार कमी प्रमाणात होते. संशोधनात नाविन्य असणे गरजेचे आहे. त्यासाठी निरीक्षण शक्ती, विश्लेषण क्षमता असायला हवी. केलेले संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकायला हवे त्यासाठी पेटंट प्राप्त करणे गरजेचे आहे. चीन मध्ये ४० लाख पेटंट दरवर्षी फाईल होतात. भारतात हे प्रमाण ९० हजाराच्या आसपास आहे. त्यापैकी केवळ २० हजार उच्च शिक्षणक्षेत्रातील पेटंट फाईल होतात हे प्रमाण वाढायला हवे अशी अपेक्षा प्रा.माहेश्वरी यांनी व्यक्त केली.
ऑनलाईन उद्घाटन करतांना पद्मश्री प्रा.जी.डी. यादव यांनी परिषदेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रा. श्रीकांता जोन्नलगड्डा यांनी आपल्या भाषणात संशोधनाच्या समस्या आणि उपाय समजण्यासाठी अशा परिषदा उपयुक्त ठरतात. त्यासोबतच तरूण संशोधकांना दिशादर्शन होते नेटवर्क तयार होते, असे ते म्हणाले. प्रारंभी प्रा.डी.एच. मोरे यांनी प्रशाळेविषयी माहिती दिली. प्रास्ताविकात निमंत्रक प्रा.डी.एस. दलाल यांनी परिषदेत ६३२ जण सहभागाी झाले असल्याची माहिती दिली. यामध्ये १८९ पदव्युत्तर विद्यार्थी, २३७ संशोधक विद्यार्थी, १९० ॲकेडमीशीयन, ०८ उद्योजक आदींचा समावेश आहे. परदेशातील ८ तज्ज्ञ देखील या परिषदेत सहभागी आहेत असे त्यांनी सांगितले. उद्घटनानंतर परिषदेचे समांतर सत्र पर्यावरणशास्त्र प्रशाळेचे सभागृह, दृकश्राव्य सभागृह आणि रसायनशास्त्र प्रशाळेचे सभागृह या चार ठिकाणी झाले. यामध्ये प्रा. प्रा.श्रीकांता जोन्नलगड्डा, दक्षिण कोरिया येथील प्रा. सोहन दाईओवन प्रा. बाबासाहेब संकपाळ, डॉ. शेषनाथ भोसले, डॉ. दिनेश सावंत, डॉ. पी.पी. वडगावकर, प्रा.व्ही.आर. पाटील, मे्क्सिको येथील प्रा. मारीसेला मार्टिनेज, प्रा. के.के. शर्मा, प्रा.एन.एन. कराडे, डॉ. बुबून बॅनर्जी, डॉ. रोहन एरंडे, डॉ. अंकुश बिरादार आदींनी मार्गदर्शन केले.
या परिषदेचा समारोप उद्या गुरूवार दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय विज्ञान शिक्षण आणि अणुसंधान संस्था (आयआयएसईआर) पुणे चे माजी वरीष्ठ प्रा. ए.ए. नातू हे उपस्थित राहणार आहेत. प्रा.पी.पी.माहुलीकर यांचा विशेष सत्कार उद्या होणार आहे.















Discussion about this post