नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र्रात भाजपला हवे तसे यश मिळाले नाही. या अपयशानंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वात बदल होईल अशी चर्चा होती. महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वात कोणताही बदल करण्यात येणार नाही, पक्षाने स्पष्ट केले.
महाराष्ट्र भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांशी भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या भाजप नेतृत्वात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकारांना सांगितले.
यंदा लोकसभा निवडणुकांत भाजपने महाराष्ट्रात नऊ जागा जिंकल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने राज्यात २२ जागा जिंकल्या होत्या. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रोड मॅप दिला आहे. लोकसभा निवडणूक हरण्याच्या कारणांवरही यावेळी चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत जातीय राजकारणाचा फटका टाळण्यासाठी व मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजप मोठे निर्णय घेणार आहे.
बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर परिणाम करणारे घटक आणि आगामी विधानसभा निवडणुकीत त्या उणिवा कशा दूर करता येतील, अशा सर्व मुद्द्यांवरही चर्चा झाली. तसेच आता भाजप महायुतीत समाविष्ट असलेल्या आपल्या मित्रपक्षांशीही चर्चा करणार आहे.















Discussion about this post