जळगाव । आधीचे वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. यातच आता रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे केळी उत्पादकांना लाखोचा फटका बसला आहे. येथील रेल्वेस्थानकावरून बुधवारी (ता. १२) सतरा व्हीपीयू वॅगन्स रेक रेल्वे प्रशासनाकडून सकाळी दहाला मिळणार होता. तो रात्री उशिरा मिळाला.
यानंतर मोठ्या शर्तीने तो भरल्यानंतरही रात्रीच रवाना न होता तो गुरुवारी (ता. १३) रात्री उशिरा दिल्लीकडे रवाना करण्यात आला. प्रशासनाच्या दिरंगाईने सुमारे ३ हजार ७०० क्विंटल केळी तब्बल चोविस तास स्थानकावरच वॅगनमध्ये पडून होती. यामुळे लाखो रुपयांच्या केळीचे नुकसान झाले.
या बाबतीत केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार व्यथा मांडूनही केळी उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागला. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना रेल्वेस्थानकावर वॅगन्स वेळेवर मिळण्यासाठी सहकार्य करावे, तसेच रेल्वे भरल्यानंतर ती वेळीच परप्रांतात पाठविण्यासाठी कार्यतत्परता दाखवावी.
त्याचबरोबर भुसावळ विभागीय डीआरएम इति पाण्डेय, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील तसेच रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केळी फळ बागायतदार शेतकरी मंडळाचे अध्यक्ष यांनी केली आहे.















Discussion about this post